कोल्हापूर - आपल्या वादग्रस्त वक्तव्याने सातत्याने चर्चेत असलेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी 'देशाचा ध्वज तिंरगा नसून भगवा असावा' असे वक्तव्य केलं आहे. कोल्हापूर येथील आंदोलनावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भिडे म्हणाले, 'आपल्या देशात सध्या जो महायज्ञ सुरू आहे, तो संपता कामा नये. हा महायज्ञ तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा देशाच्या सर्वोच्च स्थानी भगवा झेंडा फडकवला जाईल.' त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भिडे यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रध्वजाबाबतचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरात बोलताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी इतिहासाचा संदर्भ देताना म्हटले की, 'छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारणीसाठी अतुलनीय योगदान दिलं. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत मराठा सरदारांनी महाराष्ट्राबाहेरही विजयश्री खेचून आणली आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भगव्याचा झेंडा फडकवला. दिल्लीच्या मुघल तख्तावर भगवा झेंडा फडकवून मराठ्यांनी हिंदुस्थानात 19 वर्षे राजवट गाजवली होती.' भिडे यांनी या आंदोलनाला ऐतिहासिक संघर्षाची पुनरावृत्ती असल्याचं म्हटलं. 'आजच्या या उपोषणाची सांगता तेव्हाच होईल जेव्हा लाल किल्ल्यावर भगवा झेंडा पुन्हा फडकवला जाईल,' असं ते म्हणाले.
पुढं बोलताना ते म्हणाले, शिवछत्रपती गेले प्रचंड नैराश्य आलं, आता पुढे काय? असा प्रश्न समोर आला. संभाजी महाराज छत्रपती झाले, केवळ पावणे 9 वर्षे छत्रपती म्हणून काम संभाजीराजेंनी केलं, आपल्या वडिलांना शोभेल असं काम त्यांनी केलं. वडिलांच्या तोडीस तोड कर्तृत्व गाजवलं, नंतर अतिक्रूर मरण त्यांच्या वाट्याला आलं. संभाजी महाराजांची जी हत्या झाली, त्या भडव्या औरंग्याने नीचपणा केला असंही ते म्हणाले.
या सगळ्या प्रश्नांना उत्तर हिरोजी फर्जंद, शिवछत्रपतींचा भाऊ होता. तो सगळ्यांना म्हणाला, शिवाजी महाराजांची आठवण करा आपण रायगडला जाऊयात, महाराज शेवटी ज्या जागेवर होते तिथे जाऊयात. हे सर्वजण त्या जागेवर जाऊन बसले. महाराजांच्या सर्व आठवणीतून धारकरी मराठा मंडळी उठली आणि महाराष्ट्रातील धारकऱ्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर उभे-आडवे 3200 किलोमीटर लांब 3200 किलोमीटर आडवे राज्य केलं.
सारा देश पादाक्रांत केला, दिल्लीचं मुघलांच तक्त तोडलं, तुकडे केले आणि मराठ्यांनी लाल किल्ल्यावरती 1784 ते 1803 भगवा फडकवून 19 वर्ष हिंदवी स्वराज्याचे राज्य केलं. याची पुनरावृत्ती म्हणजेच हिंदुस्तानचा झेंडा तिरंगा नाही, हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा आहे. तो परत लाल किल्ल्यावर फडकवण्याच्या कामानेच आजच्या उपोषणाची समाप्ती होणार आहे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज हे डोळ्यांसमोर आहेत. त्यांच्या कामाची तीव्रता ही सूर्याच्या तेजासारखी आहे, ती मावळणार नाही. आता स्वातंत्र्य आहे, परंतु आम्हाला चंद्र हवा. एका माऊलीने रामाच्या हातात आरसा दिला आणि हातातील आरशात चंद्र पाहून राम थंड झाला तर असं होता कामा नये. काशीचा विश्वेश्वर पुन्हा निर्माण करुन पाकिस्तानचा नायनाट करु, हे स्वातंत्र्य भगव्या झेंड्याचे उत्पन्न करणारे उपोषण आहे, असंही भिडे आपल्या भाषणात म्हटले.