सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 राज्य

राज्य सरकारचा मोठा निर्णय!! शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी

डिजिटल पुणे    27-03-2024 12:01:48

नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. एकूण ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. याबाबतचे शासन परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे.

काय आहे शासन निर्णयात –

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात या निवडणुकीचे मतदान १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे व २० मे, २०२४ अशा पाच टप्प्यात होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.

ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील असं राज्य सरकारच्या परिपत्रकात म्हंटल आहे.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती