सासवड : देशाला मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले पाहिजे. तर संविधान बदलले तर फाडून टाकू संविधान कोणीही बदलू शकत नाही. नरेंद्र मोदी कधी हसत नव्हते पण त्यांना मी हसवून हसवून राहुल गांधी यांना फसवले, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
बारामती लोकसभा मतदार संघात खळद (ता. पुरंदर) येथील माऊली गार्डन कार्यालयात पुरंदर तालुक्यातील महायुतीच्या वतीने महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रकारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आठवले बोलत होते. यावेळी पुरंदर- हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपाचे निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विक्रम शेलार, सूर्यकांत वाघमारे, जालिंदर कामठे, विराज काकडे, निलेश जगताप, उत्तम घुमाळ, दत्ता झुरंगे, शरद जगताप, स्वप्निल कांबळे, ईश्वर बागमार आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, देशाला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे गरजेचे आहे. देशामध्ये महायुतीची ताकद मोठी आहे. नरेंद्र मोदी यांना गरिबीची जाणीव आहे. २४६ कोटी रुपयांपेक्षा जास्तचा निधी नागरिकांना रोजगारासाठी दिला आहे. घराघरापर्यंत गॅस पोहोचवण्याचे काम पंतप्रधानांनी केले देशाला विकासाच्या दिशेनेनेण्यासाठी नरेंद्र मोदी यांची गरज आहे. अजित पवार हे विकासकामे करणारी व्यक्ती आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज घिवार म्हणाले की, देश महासत्ता बनवण्यासाठी त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सर्वांना एकच मत देण्याचा अधिकार दिला आहे. सूर्यकांत वाघमारे म्हणाले संविधानाचे रक्षण करण्यासाठी केंद्रात रामदास आठवले यांना मंत्री केले आहे, असे त्यांनी नमूद केले.