मुंबई : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
धाराशिवमधील गोवर्धन वाडी येथे आयोजित मेळाव्यात बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी, मतदारसंघाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी सत्तेसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यापूर्वी सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांदरम्यान त्यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे म्हटले होते. मात्र आता त्यांनी अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेशाची घोषणा केली आहे.
दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. "शिवसेना एकच आहे आणि ती आमचीच आहे. बाकी सर्व भाजपचे गुलाम आहेत," असे ते म्हणाले. तसेच, ठाकरे गटातील खासदार सत्ताधारी गटात गेल्याबद्दल बोलताना त्यांनी, "नालायक लोक गेले, त्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल," अशी टीकाही केली.
याशिवाय राज्य सरकारवर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कमी केल्याचा मुद्दा उपस्थित केला. सरकारकडे लोककल्याणासाठी निधी नसला तरी खासदार फोडण्यासाठी पैसा उपलब्ध असल्याचा आरोप त्यांनी केला.
ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही त्यांना खूप काही दिलं, तरी त्यांनी हा निर्णय घेतला असेल तर त्याचं उत्तर त्यांनीच द्यावं."दरम्यान, नाशिकमधील अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या विजयाचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी, "हा तर फक्त ट्रेलर आहे," असे म्हणत एकनाथ शिंदे यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला.