पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या या घटनेत तपासादरम्यान धक्कादायक खुलासा झाला असून, केतनची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणावर आता मनोरंजन विश्वातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने लिहिले की, “आजच्या काळात सत्य ऐकणे आणि सत्य बोलणे इतके कठीण झाले आहे का, की लोक त्यासाठी दुसऱ्याचा जीव घेण्यासही तयार होतात? सत्य स्वीकारण्यापेक्षा एखाद्याचा जीव घेणे अधिक सोपे वाटते का? तू फक्त सत्य सांगू शकत होतीस आणि तुला हवे तसे आयुष्य जगू शकत होतीस. मग असे का केलेस? हे अत्यंत वेदनादायी आहे.”हिना खानच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी तिच्या भूमिकेला पाठिंबा देत या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या तपासानुसार, केतन अग्रवाल याचा मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग होता. लग्नाच्या तयारीदरम्यान सिया गोयलचे चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या नात्यातील अडथळा दूर करण्यासाठी दोघांनी मिळून कट रचल्याचा आरोप आहे.
सियाच्या वाढदिवसानिमित्त केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले. तेथे फोटो काढताना त्याला दरीत ढकलण्यात आल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे. सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत समोर आलेल्या माहितीमुळे या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले असून सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर हत्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणामुळे पुण्यासह राज्यभरात खळबळ उडाली असून, केतन अग्रवालला न्याय मिळावा अशी मागणी विविध स्तरांतून केली जात आहे.