लोणावळा/पुणे : केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने पोलिसांसमोर चौकशीदरम्यान नवा दावा करत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, तिच्या मोबाईलमधील चॅट्स आणि डिजिटल पुराव्यांमुळे हा दावा खोटा ठरत असल्याचे तपासातून समोर आले आहे.
सियाचा नवीन दावा काय?
पोलिसांना दिलेल्या जबाबात सियाने सांगितले की, तिला केतन अग्रवालशी लग्न करायचे नव्हते आणि तिने याबाबत त्याला स्पष्टपणे सांगितले होते. तिच्या म्हणण्यानुसार, लग्न मोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर केतनने "आता खूप उशीर झाला आहे, लग्न मोडणे शक्य नाही," असे उत्तर दिले होते.
चॅट्समधून समोर आले वेगळेच चित्र
तपासादरम्यान पोलिसांनी दोघांचे मोबाईल फोन जप्त करून व्हॉट्सॲपसह इतर डिजिटल संवादांची तपासणी केली. या तपासात सियाच्या दाव्याला कोणताही आधार मिळाला नाही. उलट, दोघांमधील संभाषण प्रेमळ असून लग्नाच्या तयारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे आढळले. लग्नाला विरोध किंवा वादाचे कोणतेही संकेत चॅट्समध्ये दिसून आले नसल्याने पोलिसांनी सियाच्या नव्या दाव्यावर संशय व्यक्त केला आहे.
तांत्रिक पुराव्यांवर भर
तपास यंत्रणा केवळ आरोपींच्या जबाबावर अवलंबून न राहता सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल, मोबाईल डेटा आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. सियाने गुन्ह्याचे स्वरूप बदलून दाखवण्यासाठी ही कथा रचल्याचा पोलिसांना संशय आहे.
कोठडीत सिया एकाकी
अटक झाल्यानंतर आठ दिवस उलटूनही सिया गोयलला भेटण्यासाठी तिच्या कुटुंबातील एकही सदस्य पोलीस ठाण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. तिचे आई-वडील आणि भाऊ असूनही अद्याप कोणीही तिची भेट घेतलेली नाही. त्यामुळे सिया सध्या पोलीस कोठडीत पूर्णपणे एकाकी असल्याचे सांगितले जात आहे.
चेतनच्या कुटुंबाची वेगळी भूमिका
या प्रकरणातील दुसरा आरोपी चेतन चौधरी याच्या वडिलांनी मात्र लोणावळा पोलीस ठाण्यात जाऊन तपासाची माहिती घेतल्याचे समोर आले आहे. दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी २९ जूनपर्यंत वाढवली आहे.