मुंबई : पुण्यातील लोहगड हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले असून या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शिकलेल्या आणि सुसंस्कृत कुटुंबातील तरुणांमध्ये इतकी टोकाची सूडभावना कशी निर्माण होते, याचा समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. या घटनेकडे केवळ गुन्हेगारी म्हणून न पाहता त्यामागील सामाजिक कारणांचाही सखोल अभ्यास झाला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
लोहगड येथे व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी त्यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "ही घटना अत्यंत वेदनादायी आणि अनाकलनीय आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमागील मानसिकता आणि सामाजिक परिस्थिती समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. समाज म्हणून आपण आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे."
यावेळी त्यांनी नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. या खटल्यात न्यायालयाने विक्रमी गतीने सुनावणी पूर्ण करून आरोपीला दोषी ठरवले, ही न्यायव्यवस्थेसाठी महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका असून न्यायालय त्यास मान्यता देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, सुट्टीच्या कालावधीतही न्यायालयाने सुनावणी सुरू ठेवत अल्पावधीत निकालाच्या टप्प्यापर्यंत प्रकरण पोहोचवले. त्यामुळे भविष्यात अशा गंभीर गुन्ह्यांमध्येही जलदगतीने न्याय मिळण्याचा मार्ग अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नसरापूर प्रकरणात १ मे २०२६ रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास अवघ्या १५ दिवसांत पूर्ण करून १२०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले असून येत्या २९ जून रोजी शिक्षेची घोषणा होणार आहे.