पुणे : राज्यभरात चर्चेत असलेल्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता मोठी घडामोड घडली आहे. केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. यावेळी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि न्याय मिळवून देण्यासाठी शासन कोणतीही कसूर करणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या चर्चेदरम्यान या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात व्हावी, तसेच विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी तत्काळ मान्य करत विधी व न्याय विभागाच्या सचिवांना आवश्यक निर्देश दिले. उज्ज्वल निकम यांनीही विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांना पोलिसांनी अटक केली असून तपास वेगाने सुरू आहे. चौकशीदरम्यान समोर येणाऱ्या नव्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाचा विस्तार करत सिया गोयलच्या कुटुंबीयांकडूनही माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने तिच्या भावालाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दुसरीकडे, मुलीच्या कृत्यामुळे मानसिक धक्का बसलेले सियाचे वडील अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले. माध्यमांशी बोलताना त्यांनी सियाच्या लग्नाबाबत महत्त्वाचा खुलासा केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, सियावर केतन अग्रवालसोबत विवाह करण्यासाठी कोणताही कौटुंबिक दबाव नव्हता. तिने स्वतःच्या इच्छेने केतनची निवड केली होती. केतनचे स्थळ आल्यानंतर ती आनंदी होती आणि फोटो पाहिल्यानंतरही तिने त्याला पसंती दिली होती, असा दावा सियाच्या वडिलांनी केला.दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे.