आळंदी : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरातील विविध ठिकाणी अडकलेल्या ४०८ भाविकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि संबंधित विभागांच्या संयुक्त समन्वयातून हे बचावकार्य युद्धपातळीवर पार पडले.
बचाव पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून २२०, इंद्रायणी नगरी येथून १००, ठाकूरबुवा मंडप येथून ६० आणि गोपाळपुरा येथून २८ अशा एकूण ४०८ भाविकांना सुरक्षित स्थळी हलवले. याशिवाय, शहरातील इतर भागांमध्ये वैयक्तिकरित्या अडकलेल्या भाविकांचीही सुटका करण्यात आली.पूरग्रस्त भागातील जनावरांच्याही सुरक्षिततेची काळजी घेत बचाव पथकांनी तब्बल १५० गायींना सुरक्षित ठिकाणी हलवले. प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून पुणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आळंदी परिसरातील पूरस्थिती लक्षात घेता, ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीकडे प्रवास सुरू केला आहे त्यांनी सध्या ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य सातत्याने सुरू असून परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिक आणि भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.