धाराशिव : राज्याच्या एका बाजूला मुंबई आणि पुण्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असताना, दुसऱ्या बाजूला विदर्भातील बहुतांश जिल्हे अद्यापही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार विदर्भातील ११ पैकी ८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून, गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ४३ टक्के पावसाची तूट आहे.
जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला दोन दिवस जोरदार पाऊस झाला. मात्र त्यानंतर गोंदिया आणि वर्धा वगळता विदर्भातील बहुतांश भागात पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. गडचिरोलीमध्ये सरासरीच्या केवळ ५७ टक्के, भंडाऱ्यात ७६ टक्के, वाशीममध्ये ७९ टक्के, चंद्रपूरमध्ये ८५ टक्के, अकोल्यात ८७ टक्के, नागपुरात ९४ टक्के आणि बुलढाण्यात ९५ टक्के पाऊस झाला आहे. दुसरीकडे गोंदिया (१४८ टक्के), वर्धा (१०८ टक्के) आणि यवतमाळ (१०२ टक्के) या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील धाराशिव जिल्हाही पावसाअभावी चिंतेत आहे. जुलैच्या पहिल्या पाच दिवसांत येथे केवळ १७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २५९ मिमी पाऊस झाला होता, तर यंदा आतापर्यंत अवघा १५० मिमी पाऊस झाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के क्षेत्रावरील पेरण्या अद्याप रखडल्या असून शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत आहेत.
याउलट गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सालेकसा, आमगाव आणि देवरी तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सालेकसा तालुक्यातील पिपरिया–रिसेवाडा मार्गावरील नदीत पुलाच्या बांधकामादरम्यान अचानक पाणी वाढल्याने एक टिप्पर आणि काही वाहने नदीपात्रात अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.राज्यात सध्या पावसाचे चित्र अत्यंत विषम दिसत असून, एका भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे तर दुसऱ्या भागात पावसाअभावी शेती आणि खरीप हंगाम संकटात सापडला आहे