मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकृत आकडेवारी जाहीर करत अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात सध्या सुमारे 1 कोटी 67 लाख महिला पात्र लाभार्थी असल्याचे त्यांनी सांगितले. बीड जिल्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि काही माध्यमांत फिरणारी आकडेवारीही चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया ऑगस्ट 2025 पासून सुरू करण्यात आली होती. लाभार्थींना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, तर त्रुटी दुरुस्त करण्यासाठी एप्रिलपर्यंत विशेष संधी देण्यात आली. तरीही सुमारे 60 लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. तसेच आयकर भरणाऱ्या कुटुंबांचा डेटा, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली कुटुंबे आणि वाहन मालकी यांसारख्या निकषांमुळे अनेक अर्ज अपात्र ठरल्याचे त्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्याबाबत 28 लाख महिला अपात्र ठरल्याचा दावा चुकीचा असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 32 लाख असताना असा आकडा शक्यच नसल्याचे त्यांनी म्हटले. बीडमध्ये सुमारे 6.5 लाख महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4 ते 4.5 लाख महिला पात्र असून त्यांना नियमित लाभ दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
योजनेसाठी सुरुवातीला 2 कोटी 63 लाख नोंदणी झाल्या होत्या. प्रारंभी पात्र लाभार्थ्यांची संख्या 2.43 ते 2.47 कोटी इतकी होती. मात्र ई-केवायसी, उत्पन्न आणि इतर पात्रता निकषांची पडताळणी झाल्यानंतर अंतिम पात्र लाभार्थ्यांची संख्या 1.67 ते 1.70 कोटींवर आली आहे. नुकताच वितरित करण्यात आलेला हप्ता 1.67 कोटी महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आल्याची माहितीही आदिती तटकरे यांनी दिली.