मुंबई : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा ११.४० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहेत. हे अद्ययावत स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित केले जाणार आहे.या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी खासदार असताना आणि दिवंगत अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी सातत्याने केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या संयुक्त प्रयत्नांना यश आले असून बारामतीकरांचे आधुनिक रेल्वे स्थानकाचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, १९१४ पासूनचा इतिहास असलेल्या या स्थानकाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर आता झालेले हे आधुनिकीकरण बारामतीच्या प्रगतीला नवी गती देईल. रोज अंदाजे १,८०० प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या या स्थानकावर आता दिव्यांग-अनुकूल सुविधा, आधुनिक प्रतीक्षा कक्ष, पार्किंग आणि सुंदर प्रादेशिक स्थापत्य शैलीचा मिलाफ पाहायला मिळत आहे.बारामती हे राज्याचे प्रमुख कृषी, शैक्षणिक व औद्योगिक केंद्र असल्याने या जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे स्थानिक व्यापार, दळणवळण आणि पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.