दिल्ली : संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी आणि तरुण आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठीमार केल्याचा गंभीर आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. जंतरमंतर येथे मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारलाही लक्ष्य केले.
दिपके यांनी दावा केला की, लाठीमारात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून काही विद्यार्थिनींवरही अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यात आला. एका अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिचे कपडे फाडण्यात आले, छातीवर पाय देण्यात आला, तर दुसऱ्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर काठ्यांनी वार करण्यात आल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
संसद मार्च मागे घेण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतल्याचे सांगत दिपके म्हणाले की, पोलिसांचा लाठीमार इतका आक्रमक होता की आणखी विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात येऊ नयेत म्हणून मोर्चा स्थगित करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वॉटर कॅननसारख्या पर्यायांचा वापर करता आला असता, मात्र त्याऐवजी थेट लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
लाठीमारात सुमारे १५० विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करत त्यांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. जंतरमंतर परिसरात मोठ्या प्रमाणात दगड कसे पोहोचले, तसेच काही जण सिव्हिल ड्रेसमध्ये आंदोलनकर्त्यांवर हल्ला करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांच्याशीही पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा दावा दिपके यांनी केला. या संपूर्ण प्रकरणासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना जबाबदार धरत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.