परभणी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ५५ वा वाढदिवस साजरा होत आहे. या दिवसाचे औचित्य साधत राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यात ‘हरित क्रांती’ चा संकल्प केला. या उपक्रमांतर्गत ‘देव वन’ च्या माध्यमातून जिल्हाभरात ५५ हजार वृक्ष लागवड करण्यात आली .
जिल्हा प्रशासन, नगर परिषदा, सेवाभावी संस्था आणि वृक्षप्रेमींच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलके नाही तर कर्ते समाजसुधारक आहेत. अशा नेतृत्वाचा वाढदिवसही प्रत्यक्ष कृतीतून साजरा व्हावा, या हेतूने हा उपक्रम राबवला जात असल्याचे बोर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा एक भाग म्हणून सेलू, जिंतूर, पाथरी, मानवत, सोनपेठ, पालम, पूर्णा, गंगाखेड आणि परभणी या नऊ ठिकाणी ‘देववन मियावाकी जैवविविधता उद्यान’ विकसित करण्यात आले आहेत. या सर्व उद्यानांचे २२ जुलै रोजी सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एकाच वेळी लोकार्पण करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती देताना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले, ‘’मियावाकी पद्धतीद्वारे अत्यल्प जागेत अल्पावधीत दाट जंगल निर्माण करता येते. या पद्धतीमुळे स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन, कार्बन शोषण, क्षमता वाढ, हवेची गुणवत्ता सुधारणा तसेच पर्यावरणीय समतोल राखण्यास मोठी मदत होते. त्यामुळे ‘देववन’ हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून, भावी पिढ्यांसाठी समृद्ध हरित वारसा निर्माण करण्याच्या व्यापक उद्देशाने राबविण्यात येत आहे.’’ पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि लोकसहभागाच्या बळावर हरित भविष्य घडविण्याच्या दिशेने ‘हरित संकल्प’ हा उपक्रम संपुर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे.