पुणे : दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला सहा महिने पूर्ण झाले असतानाही तपासाचा अंतिम अहवाल अद्याप जाहीर न झाल्याने युगेंद्र पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणावे आणि तपास यंत्रणांनी चौकशीचा अहवाल सादर करावा, अशी त्यांनी मागणी केली.
युगेंद्र पवार म्हणाले की, अपघातानंतर सादर करण्यात आलेला प्राथमिक अहवाल समाधानकारक नसून त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे सखोल आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
'सहा महिने झाले, तरी अहवाल कुठे?'
दुर्घटनेनंतर इतका कालावधी उलटूनही अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. बारामतीतील नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. एवढ्या मोठ्या घटनेचा तपास इतका लांबणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सीसीटीव्ही आणि तपासावरही प्रश्न
मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजसह महत्त्वाचे पुरावे अद्याप सार्वजनिक झाले नसल्याचा दावा करत, सीआयडी आणि डीजीसीएसारख्या यंत्रणा तपास करत असताना इतका विलंब का होत आहे, असा सवाल युगेंद्र पवार यांनी उपस्थित केला. बारामतीकरांना या दुर्घटनेबाबत संपूर्ण सत्य जाणून घेण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी म्हटले.
"आमचा संयम सुटत चाललाय"
"आम्ही सहा महिने संयम ठेवला, मात्र आता लोकांना स्पष्ट उत्तरे हवी आहेत. तपासातून जे काही निष्पन्न झाले आहे, ते जनतेसमोर मांडले गेले पाहिजे," असे सांगत त्यांनी तपास यंत्रणांना अंतिम अहवाल लवकर सादर करण्याचे आवाहन केले.
शरद पवार–मोदी भेटीवरही प्रतिक्रिया
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील भेटीबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, देशातील अनुभवी नेत्यांपैकी शरद पवार यांचे स्थान महत्त्वाचे आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याचे स्वतः शरद पवार यांनी सांगितले होते. त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.