पुणे : पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा वाढत असून, त्याचा परिणाम म्हणून नदीपात्रातील पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने एकता नगर, विठ्ठल नगर, निंबझ नगर तसेच मुठा नदीकाठच्या पूरप्रवण भागातील नागरिकांना तातडीचा सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. प्रशासनाने नागरिकांना कोणतीही निष्काळजीपणा न करता सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या धरणातून सुमारे ३५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्यास हा विसर्ग ४५ हजार ते ५० हजार क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या सखल भागांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी आपली चारचाकी, दुचाकी वाहने, महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू तसेच आवश्यक जीवनावश्यक साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना प्राधान्याने सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
ज्या नागरिकांकडे पर्यायी निवासाची व्यवस्था उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सनसिटी बॅडमिंटन हॉल येथे तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे आवश्यक त्या मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, आपत्ती व्यवस्थापन पथके, अग्निशमन दल आणि अन्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या परिसरावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवण्याचे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीपात्र, पूल किंवा पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी गर्दी करू नये, सेल्फी काढण्याचा किंवा पाण्यात उतरून धोका पत्करण्याचा प्रयत्न करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पावसाची स्थिती आणि धरणातील विसर्ग लक्षात घेता पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.