गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात शनिवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. राणी खेडेगाव येथे आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या चार शालेय विद्यार्थ्यांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी सुदैवाने बचावला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील अनेक नागरिक शेतात धान रोवणीच्या कामात व्यस्त असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चार विद्यार्थी गावाजवळील सती नदीवर आंघोळीसाठी गेले होते. नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे पाण्यात बुडाले. सोबत असलेल्या एका विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखल्याने त्याचा जीव वाचला.
या दुर्घटनेत लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (वय ६), कुणाल रमेश दूधकवर (वय ५) आणि मोहित हिवराज सराटे (वय ११) या तिन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
एकाच गावातील तीन निष्पाप मुलांचा अशा प्रकारे झालेला मृत्यू गावकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरला आहे. राणी खेडेगावासह संपूर्ण कुरखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.