उरण : सध्या राज्यभरात चर्चेत असलेल्या "डिजिटल अटक" आणि "मनी लॉन्ड्रिंग"च्या नावाने होणाऱ्या फसवणुकीचा एक गंभीर प्रकार उरणमध्ये उघडकीस आला आहे. उरण येथील बोरी नाका परिसरात राहणाऱ्या 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला टेलिकॉम कंपनी आणि सीबीआय अधिकाऱ्याच्या नावाने धमकी देऊन तब्बल 29 लाख 36 हजार 94 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री. शांताराम हे राहणार उरण येथे राहत असून ते सेवानिवृत्त आहेत. दिनांक 14 जुलै 2026 रोजी दुपारी 2.45 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईल क्रमांक वरून या अनोळखी क्रमांकावरून एका महिलेचा फोन आला. सदर महिलेने स्वतःला टेलिफोन निगममधून बोलत असल्याचे सांगितले आणि शांताराम या नावाने मुंबईत एक बनावट सिमकार्ड वापरले जात असल्याचे सांगून धमकी दिली.
या फोननंतर काही दिवसांनी या वेगवेगळ्या क्रमांकावरून वेगवेगळ्या व्यक्तींचे कॉल येण्यास सुरुवात झाली. कॉल करणाऱ्यांपैकी एकाने स्वतःला राजेश प्रधान नावाचा इनव्हेस्टिगेशन ऑफिसर, दुसऱ्याने राजेंद्र सिंग नावाचा सीबीआय अधिकारी आणि तिसऱ्याने सुनीलकुमार गौतम नावाचा पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनी शांताराम म्हात्रे यांना सांगितले की संदीप कुमार नावाच्या व्यक्तीच्या मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज स्मगलिंग आणि वुमन ट्रॅफिकिंग या गुन्ह्यात त्यांच्या नावाने आयसीआयसीआय बँकेत 78 लाख रुपये जमा झालेले आढळून आले आहेत आणि यात त्यांना अटक होऊ शकते.
या भीतीपोटी आणि अधिकाऱ्यांच्या धाकाने शांताराम यांनी 14 जुलै ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत वेगवेगळ्या वेळी आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये एकूण 29 लाख 36 हजार 94 रुपये जमा केले. पैसे गेल्यानंतरही आरोपींनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शांताराम यांनी 17 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9.01 वाजता उरण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून उरण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 204, 318(4), 319(2), 3(5) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 66(डी) तसेच भादंवि कलम 170, 420, 419, 34 प्रमाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 299/2026 दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास उरण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल काटवाणी हे करत आहेत. घटनास्थळी ठाणे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर आणि पोलीस उपनिरीक्षक रोशन काथारा यांनी देखील भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी फिर्यादीचा जबाब यथार्थ प्रणालीद्वारे नोंदवून घेतला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या घटनेनंतर उरण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या नावाने फोन आल्यास घाबरून जाऊ नये. सीबीआय, पोलीस किंवा इतर कोणतीही यंत्रणा फोनवर पैसे मागत नाही किंवा डिजिटल अटक करत नाही. अशा प्रकारचा संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा 1930 या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा.