पुणे : काँग्रेस नेते श्री. राहुल गांधी हे दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील विद्यार्थ्यांशी ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पुणे RTOजवळील AISSMS महाविद्यालयाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज पूर्वतयारी आणि सुरक्षा व्यवस्थेची पोलीस प्रशासनासोबत पाहणी करण्यात आली.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने मैदानाची व्यवस्था, प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहतूक नियोजन, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था तसेच कार्यक्रमस्थळी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. कार्यक्रम सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक त्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली.
पाहणीनंतर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यक्रमाच्या आयोजनासोबतच सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, तसेच कार्यक्रमाच्या दिवशी वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
या बैठकीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी श्री. सतेज (बंटी) पाटील, केंद्रीय निरीक्षक श्री. के. जी. बैजू, श्री. मनोज त्यागी, ज्येष्ठ नेते श्री. मोहनदादा जोशी, प्रशांत जगताप पुणे श्रीमती दीप्तीताई चवधरी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. शिवराज मोरे, आमिर शेख यांच्यासह पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, अतिरिक्त आयुक्त श्री. राजेंद्र बनसोडे, उपायुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर तसेच पोलीस प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना, अपेक्षांना आणि त्यांच्या भविष्यासंदर्भातील मुद्द्यांना व्यासपीठ मिळणार आहे. राहुल गांधी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार असल्याने पुण्यातील विद्यार्थी व युवकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नियोजन करण्यात येत असून, पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कार्यक्रमाची सुरक्षा आणि व्यवस्थापनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दि. २२ ऑगस्ट रोजी AISSMS महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाकडे पुणे शहरातील राजकीय तसेच विद्यार्थी व युवकवर्गाचे लक्ष लागले आहे.
