सांगली : मिरज तालुक्यातील अंकली येथील माजी सरपंचावर बँक व्यवस्थापकाच्या घरात चोरी केल्याचा आरोप झाल्याने सांगलीत खळबळ उडाली आहे. विश्रामबाग परिसरातील एसटी कॉलनीत ही चोरी झाली. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित माजी सरपंच राहुल अनिल पाटील याला ताब्यात घेतले. चोरीचा मुद्देमालही त्याच्याकडून जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
विश्रामबाग येथील एसटी कॉलनीत राष्ट्रीयकृत बँकेत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या अश्विन शिवकुमार पिल्ले यांचे घर आहे. १९ ऑगस्ट रोजी पिल्ले यांचे घर बंद असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. परिसरातील CCTV फुटेज तपासल्यानंतर चोरीच्या घटनेत राहुल पाटील याचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. चौकशीनंतर त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
राहुल पाटील हा अंकलीचा माजी सरपंच असून तो भाजपशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. गावातील माजी लोकप्रतिनिधीवरच चोरीचा आरोप झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, वैद्यकीय कारणास्तव त्याला जामीन मिळाल्याची माहिती आहे.
सांगलीत मेंढपाळांचा आक्रोश; मेंढ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा अडवला
सांगली : कवठेमहांकाळ येथे मेंढ्या आणि बकऱ्यांच्या चोरीच्या घटनांचा तपास होत नसल्याच्या निषेधार्थ मेंढपाळांनी आक्रमक पवित्रा घेतला. मेंढपाळांनी मेंढ्यांसह कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा तेथून जात असताना आंदोलकांनी रस्त्यावर मेंढ्या उभ्या करून ताफा अडवला.
गेल्या काही काळात मेंढपाळांच्या कळपातून मोठ्या प्रमाणात मेंढ्या चोरीला जात असल्याची तक्रार आहे. आतापर्यंत जवळपास ६० मेंढ्या चोरीला गेल्या असून, तक्रारी करूनही घटनांचा तपास होत नसल्याचा आरोप मेंढपाळांनी केला आहे.
पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करताना मेंढपाळांनी आपली व्यथा प्रशासनासमोर मांडली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मेंढपाळांच्या समस्या मांडत चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करण्याची मागणी केली.
मेंढ्या चोरीला जाण्याच्या घटना वाढत असूनही कारवाई होत नसल्याने मेंढपाळांमध्ये तीव्र नाराजी आहे. चोरीला गेलेल्या मेंढ्यांचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.