पुणे : महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी व भविष्यात त्यांना संशोधक बनविणारे प्रभावी व्यासपीठ म्हणजे ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील छोट्या-छोट्या कल्पनांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाल्यास त्यातून संशोधनाचा मोठा वटवृक्ष उभा राहू शकतो, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे सहायक अधिष्ठाता व बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात आविष्कार संशोधन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती निर्माण होण्यासाठी आयोजित आविष्कार स्पर्धच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ट्रिनीटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॅा. वंदना पिंपळे, विज्ञान शाखा समन्वयक व वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंदा हासे, समन्वयक डॉ. राणी भगत उपस्थित होते.
सदर स्पर्धेत मानव्यविद्या-भाषा-ललित कला, वाणिज्य-व्यवस्थापन-विधी, सामान्य विज्ञान, शेती व पशुपालन, अभियांत्रिकी, आणि औषध निर्माण शास्त्र या विविध विद्या शाखांतील पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या सुमारे एकूण ८५ विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवत ५५ सर्वोत्कृष्ट प्रकल्प सादर केले. या स्पर्धेकरिता बाह्य परीक्षक म्हणून ट्रिनीटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे तर अंतर्गत परीक्षक म्हणून डॉ. प्रवीण चोळके, डॉ. मनीषा शेवाळे, डॉ. विजय घाडगे, डॅा. मेधा मिसर, डॉ. क्रांती बोरावके व डॉ. अमृता इनामदार यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी डॅा. मनीषा शिंदे, डॉ. गीतांजली शेलार, प्रा. वीणा कारंडे, प्रा. नीलम खोमणे, स्मिता गायकवाड, विश्वास सस्ते, रोहिदास खोंडे, सुभाष नागपूरे, अशोक मगर यांच्यासह वनस्पती शास्त्र विभागातील सर्व अध्यापक, आविष्कार संशोधन समितीचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले असून छायाचित्रणासाठी प्रणित पावले यांनी विशेष सहकार्य केले.