पुणे : भाजपचे बावनकुळे यांनी काल पुण्यात बोलताना काँग्रेस फोडा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील करून घ्या असे जाहीर आवाहन केले आहे. आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी यावर जोरदार टीका केली आहे.
' एकेकाळी भाजप स्वतःला ' पार्टी विथ डिफरन्स ' म्हणून घेत असे आणि तत्त्वांवर चालणारी कार्यकर्त्यांची फळी असल्याचा दावा करीत असे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आयात उमेदवारांवरच भाजपचा भर दिसून आलेला आहे. आता उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांनाही भाजप दरवाजे खुले करीत आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यामधील हिंदुत्वाचा मुद्दा सोडता इतर कुठल्या मुद्द्यांच्या बाबतीत मतभेद नाहीत हे उघड आहे. शिक्षण, आरोग्य,रोजगार आदी धोरणात्मक बाबींवर काम करताना काँग्रेसच्या कामगिरीत आणि भाजपच्या कामगिरीत फारसे उजवे डावे करता येणार नाही अशी स्थिती आहे.' असे आप प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती सरकार मधले पक्ष नावाने जरी वेगवेगळे असले तरी त्यातील अनेक मंत्री तेच आहेत. काँग्रेस मधीलच सरंजामदार आणि घराणेशाही असलेले नेते भाजपने उचलून त्यांना महत्त्वाची पदे दिली आहेत. त्यासाठी जरूर तिथे इडी सीबीआयचा वापर करूनही हे केले आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मोदींच्या हुकूमशाही विरुद्ध लढणारे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार आता भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेस यांच्या मधला सेतू खुला झाला आहे.
या पुढच्या राजकारणात आम आदमी पार्टी सारखा पर्याय जनतेच्या प्रश्नाला उत्तर काढू शकेल. राजकारणातील हा लढाईचा टप्पा कठोर परिश्रमाचा आहे परंतु स्थानिक निवडणुकीच्या द्वारे आम आदमी पार्टी हा व्यवस्था परिवर्तनाचा पर्याय मतदारांसमोर उभा करेल असेही मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.