नवी दिल्ली :जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. खरं तर भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड ने आयपीएल स्पर्धा १ आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. मात्र आता नवीन अपडेट्स नुसार, जर बीसीसीआयने पुन्हा एकदा आयपीएल सुरु करण्याचा निर्णय घेतल्यास देशातील फक्त ४ शहरांतच ती खेळवली जाऊ शकते. यामध्ये कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैद्राबादचा समावेश आहे. बीसीसीआय याबाबत सध्या विचार करत असून ८ दिवसात निर्णय घेण्यात येईल. परंतु देशातील सर्व एकूण परिस्थितीवरच ते अवलंबून असेल.
देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात IPL सुरू करण्याचा विचार
सूत्रांनुसार, जर स्पर्धा एका आठवड्यात पुन्हा सुरू होऊ शकली तर बीसीसीआय देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागात स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. पुढील आठवड्यात लीग पुन्हा सुरू झाल्यास बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये आयोजित करू शकते. पण भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाकडे पाहूनच बीसीसीआय कोणताही निर्णय घेणार आहे. जर सीमेवरील परिस्थिती आधीसारखी सुरळीत झाली तर ठरल्याप्रमाणे देशातील सर्वच स्टेडियम वर सामने खेळवण्यात येऊ शकतात. पण भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाकडे पाहूनच बीसीसीआय कोणताही निर्णय घेणार आहे. असेही बोललं जातंय कि जर भारत आणि पाकिस्तान मधील संघर्ष वाढतच राहिला तर, बीसीसीआय जूनमध्ये सुरू होणाऱ्या आणि ऑगस्टमध्ये संपणाऱ्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर आयपीएल आयोजनाचा कार्यक्रम करू शकते. आयपीएलचे अजूनही एकूण 16 सामने शिल्लक आहेत. 25 मे रोजी कोलकाता येथे ही स्पर्धा संपणार होती.
दरम्यान, 8 मे रोजी किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कपिटल्स यांच्यातील धर्मशाळा येथील सामना चालू स्थितीत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एका वरिष्ठ क्रिकेट अधिकाऱ्याच्या फोन कॉल नंतर सामना रद्द करण्यात आला. स्टेडियमचे लाईट टॉवर बंद करण्यात आले आणि मैदानातं अंधार करण्यात आला. त्यानंतर प्रेक्षकांना बाहेर पडण्यास सांगितलं. तसेच दोन्ही संघांच्या खेळाडूंना ताबडतोब आपापल्या बसेसमध्ये चढून टीम हॉटेलमध्ये परतण्यास सांगण्यात आले. त्यानंतर संपूर्ण IPL स्पर्धाच आठ्वड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. बीसीसीआय सध्या सर्व युद्धजन्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.