मुंबई : भारतीय क्रिकेटची रनमशीन विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. खरं तर रोहित शर्माच्या निवृत्तीनंतरच विराट कोहलीही कसोटीला रामराम ठोकणार अशा बातम्या प्रसारित होत होत्या. विराटने कसोटी क्रिकेट मधील निवृत्तीबाबत बीसीसीआयला कळवलं आहे असेही समोर येत होत, मात्र तू पुन्हा एकदा याबाबत विचार करत अशी विनंती बीसीसीआयने कोहलीला केली होती. परंतु विराट त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि अखेर आज त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली निवृत्ती जाहीर केली. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटला तर मोठा फटका बसला आहेच, पण त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
माझ्याकडे जे जे होते ते सगळं मी दिले
विराटने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. तो म्हणाला, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घालून मी 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मला लक्षात राहतील असे धडे शिकवले.
पांढऱ्या पोशाखात खेळणे हे नेहमीच्या माझ्यासाठी खास राहिले आहे. शांत खेळ, लांब दिवस, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात. मी या फॉरमॅटमधून बाहेर पडताना, ते सोपे नाही – पण हा निर्णय मला बरोबर वाटतो. माझ्याकडे जे जे होते ते सगळं मी दिले. आणि या फॉर्मेटने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त रिटर्न सुद्धा दिले. मी कृतज्ञतेने भरलेल्या हृदयाने इथून निघत आहे – खेळासाठी, मी ज्या लोकांसोबत खेळलो त्यांच्यासाठी आणि वाटेत मला दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी.मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहतो. #269, साइनिंग ऑफ.
खरं तर असं बोललं जातंय कि, या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतरच वीट कोहली त्याच्या कसोटी भविष्याचा विचार करत होता, त्यानंतर अखेर त्यानं त्याच्या मनाची तयारी केली आणि आपण कसोटी क्रिकेट मधून निवृत्त होतोय असं बीसीसीआयला कळवलं होते . परंतु आगामी इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका महत्वाची असल्याने विराटने आपल्या निर्णयावर फेरविचार करावा अशी विनंती बीसीसीआयने विराटला केली होती. तरीही विराटने निवृत्तीचा निर्णय कायम ठेवला आणि अखेर आज त्याबाबतची घोषणा करून टाकली. कर्णधार रोहित शर्माने सुद्धा मागच्या आठवड्यातच कसोटी मधून निवृत्ती जाहीर केली त्यानंतर आज ५ दिवसानी विराटनेही कसोटीला रामराम ठोकल्याने भारतीय क्रिकेटला मोठा फटका बसला आहे.
कशी आहे विराटची कसोटी कारकीर्द –
दरम्यान, ३६ वर्षीय कोहलीने भारतासाठी १२३ कसोटी खेळल्या आहेत. त्यात त्याने ४६.८५ च्या सरासरीने ९,२३० धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये व विराटने ३० शकते आणि 31अर्धशतके झळकावली आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व सुद्धा त्याने बरीच वर्ष केले. मात्र गेल्या पाच वर्षांत त्याची कसोटी सरासरी चांगलीच घसरली. मागील ५ वर्षातील ३७ कसोटी सामन्यांमध्ये ३ शतकांसह त्याच्या बॅट मधून अवघ्या १,९९० धावा निघाल्या. ऑस्ट्रेलियाच्या अलिकडच्या दौऱ्यात, त्याने ५ कसोटी सामन्यांमध्ये सरासरी २३.७५ धावा केल्या. धक्कादायक बाब म्हणजे ८ पैकी ७ वेळा तो ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर बाद झाला होता.
विराटच्या आक्रमक आणि निडर खेळामुळे तो नेहमीच क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून काढणे कोणत्याही युवा खेळाडूसाठी मोठे आव्हान असेल.त्याच्या चाहत्यांसाठी हा एक अत्यंत भावनिक क्षण असून, समाजमाध्यमांवरून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.