पुणे :महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा एआय चेहरा वापरुन एका निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे.
'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'द्वारे खोटा चेहरा बनवून नांगरे पाटील बोलत असल्याचे भासवत सेवानिवृत्त अधिकारी एकनाथ जोशी यांच्याकडून ७८ लाख लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ९ जुलै रोजी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांच्या खात्यावरुन तुमच्या बँक खात्यात २० लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी ६ दिवसांत तब्बल ७८ लाख ६० हजारांना लुटले. धक्कादाकाय बाब म्हणजे, तक्रारदाराचा विश्वास बसण्याासाठी सायबर गुन्हेगारांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर ४ जुलै रोजी व्हिडीओ कॉलवर नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या वक्तीने सवांद साधत त्यांना विश्वासात घेतलं.
७७ वर्षीय तक्रारदार, जे विभागीय आयुक्तालयातून सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना २ जुलै रोजी एका पोलीस गणवेशातील व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. या व्यक्तीने आपले नाव संजय पिसे असून, आपण आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचे सहकारी असल्याची बतावणी केली.
त्याने जोशी यांना सांगितले की, त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात २ कोटी रुपयांचा 'बेहिशेबी' व्यवहार झाला असून, त्याचा थेट संबंध दहशतवादी अब्दुल सलाम याच्यासोबत आहे. अब्दुल सलाम याच्या खात्यातून जोशींच्या खात्यात २० लाख रुपये जमा झाल्याचे सांगत, राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुन्हा दाखल केला असून त्यांना तात्काळ अटक करण्यात येईल, अशी धमकी दिली.
त्यामुळे घाबरलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने ७८ लाख ६० हजार रुपये ७ जुलैपर्यंत सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या तीन बँक खात्यांवर पाठवले. तक्रारदाराचे सर्व पैसे बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्यावर जमा झाले. पवन मेहुरे, करण कुन्हे आणि आशिक नागफुसे यांच्या नावे असलेल्या बँक खात्यात हे पैसे वळते झाले आहेत. हे खाते गोंदिया व मुंबईतील शाखांमध्ये असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या संदर्भात सखोल तपास करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली आहे. सायबर गुन्हेगारांनी वापरलेली ही अत्यंत पद्धतशीर आणि मानसिक छळवणूक करणारी फसवणुकीची पद्धत नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही संशयास्पद कॉल्सना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.