मुंबई : जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. असे विधान शरद पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे पाटील यांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला आहे. मात्र, रोहित पवार यांनी पाटील यांच्या राजीनाम्याचे वृत्त मान्य करत नवीन प्रदेशाध्यक्ष १५ जुलै रोजी जाहीर होईल अस म्हटले आहे. त्यामुळे पवारांच्या पक्षात नेमक सुरु आहे तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आव्हाड यांनी ट्विट करत राजीनाम्या वृत्त फेटाळले आहे. तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी राजीनाम्याचे वृत्त माहिती नसल्याचे सांगत पक्षाची एक पद्धत असते. पक्षाची बैठक होऊन त्याच्यात निर्णय घेतला जातो असे त्यांनी म्हटले.
आव्हाड नेमकं काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, जी माहिती तुम्हाला मिळाली आहे ती मला मिळाली नाही, पक्षाची एक पद्धत असते. पक्षाची बैठक होऊन त्याच्यात निर्णय घेतला जातो असे त्यांनी म्हटले. तसेच, पक्षात कोणतीही नाराजी नाही, शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत, हे तुमच्याकडून मला कळत आहे. पवार साहेब हे विश्वासात घेऊन, बैठक घेऊन असे निर्णय घेत असतात. असे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
तर ट्विट कर हे वृत्त म्हणजे निव्वळ खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे. जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो, असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळलं आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम आहे. विशेष म्हणजे दुसरीकडे रोहित पवारांनी राजीनाम्याचे वृत्त मान्य करत नवीन प्रदेशाध्यक्ष १५ जुलै रोजी जाहीर होईल, ते नाव जयंत पाटील हेच जाहीर करतील, असे म्हटलं आहे.