मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेताना दिसत आहेत. काँग्रेसने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांना मनसेची साथ सोडून आमच्यासोबत या, अशी ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला विश्वासात न घेता मनसेसोबतची जवळीक वाढवल्याने काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
काँग्रेसने आधीच मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, उद्धव ठाकरे मनसेची साथ सोडून आघाडीत आले तर ‘स्वबळा’च्या निर्णयाचा पुनर्विचार केला जाऊ शकतो, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. पण यासाठी काही ठोस अटी-शर्ती लागू असतील, अशी माहितीही समोर येत आहे.
मनसेचा स्वतंत्र निर्णय — संदीप देशपांडे
काँग्रेसच्या या ऑफरवर मनसेने तातडीने प्रतिक्रिया दिली आहे.“मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. इतरांनी काय बोललं त्याच्याशी आमचं काही देणंघेणं नाही. आमचे निर्णय राज ठाकरेच घेतील,” असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार अॅक्शन मोडमध्ये
महाविकास आघाडीची फूट टाळण्यासाठी शरद पवार आता सक्रिय होताना दिसत आहेत.पवारांचे मत आहे की महाविकास आघाडीनेच मुंबई महापालिका निवडणूक लढवावी, अशी माहिती राष्ट्रवादीतील विश्वासू सूत्रांनी दिली. शिवाय, पवारांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी फोनवर चर्चा केल्याचेही समजते.
मतदार यादीतील घोळ आणि मतचोरीविरोधात तिन्ही पक्ष एकत्रितपणे आंदोलन करत असताना निवडणूक वेगवेगळी का लढायची? असा सवाल पवारांकडून उपस्थित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, मनसेला आघाडीत सामावून घेण्याबाबतही पवार सकारात्मक आहेत.
काँग्रेसचा स्वतंत्र मोर्चा?
शरद पवार मनसेला आघाडीत घेण्याबाबत सकारात्मक असतानाही काँग्रेस मात्र राज ठाकरे यांच्यासोबत जाण्यास तयार नाही.“समविचारी पक्षांनाच सोबत घेणार,” अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली.रिपाई आणि इतर लहान समविचारी घटक पक्षांना सोबत घेऊन काँग्रेस वेगळा मोर्चा तयार करण्याच्या तयारीत आहे.काँग्रेसची महत्त्वाची बैठक सोमवारी किंवा मंगळवारी होण्याची शक्यता असून त्यात शरद पवारांच्या भूमिकेवर निर्णय होणार आहे.