उरण : "रयतेच्या राज्यासाठी जिवाची बाजी लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. याकामी त्यांनी अठरापगड जाती धर्मांतील मावळ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले होते. वारकरी परंपरेतील समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता हा विचारच स्वराज्याची पायाभरणी करणारा ठरला. शिवरायांनी शेतकऱ्यांच्या हिताची आणि स्त्रियांच्या सन्मानाची कसोशीने काळजी घेतली. गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली. शिवरायांनी राज्यव्यवहार कोश तयार करून मातृभाषेतून कारभार हाकण्याचा पायंडा पाडला. तोच कित्ता पुढे संभाजी महाराजांनी गिरविला. संभाजी महाराजांनी अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्यनिष्ठा सोडली नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातच तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
त्यामुळेच चारशे वर्षांनंतरही शिवरायांचा जगात डंका वाजतोय. ते जगाचे मनेजमेंट गुरू आहेत. गनिमी काव्याद्वारे शिवरायांनी भल्याभल्या बलाढ्य शत्रूंना चारीमुंड्या चित केले. त्यामुळे रायगड किल्ल्यावर शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे शिवरायांच्या विचारांना बळकटी देण्यासाठी जनचळवळीची मोहीम सुरू केली आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे. शिवरायांच्या विचाराला धक्का लागणार नाही, अशाच प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रचले. अठरापगड जाती-जमातींतील जनतेला सुखासमाधाने जगता यावे, असाच विचार बाबासाहेबांनीही केला, परंतु आजचे सरकार संविधान पायदळी तुडवीत आहे. त्यामुळेच जाती-जातींत तेढ निर्माण होत आहेत. या देशात प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. एकंदरीत देशातील सध्याचे वातावरण पाहाता लोकशाही वाचविण्याची गरज आहे," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत रायगड किल्ल्यावर शिवरायांना अभिवादन केल्यानंतर म्हणाले.
भारताची सध्याची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती पाहाता येथील सर्वसामान्यांना आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी संविधान जनतेत रुजवणे गरजेचे आहे. या विचारानेच संविधान दिनानिमित्त २५ व २६ नोव्हेंबरला शिवशंभू स्वराज्य मोहीम राबवण्यात आली. यावेळी चवदार तळ्यावर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. तसेच राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांना पाचाड येथे मानवंदना देण्यात आली.
बुधवारी (ता.२६) छत्रपती शिवाजी महाराज यांना वारकरी व सर्व धर्मांतील जनतेकडून मानवंदना देण्यात आली आणि समतेचा संदेश आणि शिवरायांची शपथ देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन म्हणाल्या, "महेंद्रशेठ घरत यांनी दोन दिवसांसाठी शिवप्रेमींचा अन्नदानाचा भार उचलला. त्यांनी नियोजनातही मोठी भूमिका निभावली. त्यामुळे आमचे नियोजन सोपे झाले. पाचाड आणि रायगडावर तरुण, वारकरी आणि कीर्तनकारांचा संगम होणे ही अनोखी गोष्ट आहे. 'संत स्वराज्य संविधान' हीच मुख्य थीम कार्यक्रमाची होती."
या मोहिमेत सुमारे चार हजार शिवप्रेमी उपस्थित होते. त्यांच्यासाठी नाश्ता आणि जेवणाची सुविधा महेंद्रशेठ घरत यांनी केली होती.यावेळी काँग्रेसच्या रायगडच्या प्रभारी श्रीमती राणीताई अग्रवाल, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, धनाजी गुरव, कीर्तनकार फडतरे महाराज, ह.भ.प. भारतमहाराज जाधव, कैलास देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच एम. जी. ग्रुपचे सहकारीही आवर्जून उपस्थित होते.