धुळे : विद्यार्थिनींना संकट समयी स्व संरक्षण करता यावे म्हणून विद्यार्थिनींना प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यासाठीच जिल्हा प्रशासनाने वीरांगना प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून विद्यार्थिनी स्व संरक्षणात आत्मनिर्भर होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर सुरू झालेल्या (दि. २७ नोव्हेंबर) तीन दिवसीय वीरांगना प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्य प्रशिक्षक शिफूजी शौर्य भारद्वाज, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील,अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, अधीक्षक अभियंता अनिल पवार, कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, शिक्षणाधिकारी मनीष पवार (माध्यमिक), किरण कुवर (प्राथमिक), जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, विद्यार्थिनींमध्ये ज्ञान, आत्मभान आणि सामर्थ्य निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी चांगला समन्वय ठेवला आहे. या प्रशिक्षण वर्गात जिल्ह्यातील सर्व माध्यमातील विद्यार्थिनी सहभागी होत आहेत. या उपक्रमातून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थिनींना पुढील आयुष्यात होऊन त्या स्व- संरक्षणासाठी सिद्ध होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी व्यक्त केला.
श्री. शिफूजी यांनी विद्यार्थिनींनी स्व संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या उपक्रमातून स्व संरक्षणासाठी प्रशिक्षण मिळणार आहे, अशा प्रतिक्रिया विविध विद्यालयातून आलेल्या विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.शिक्षण विस्तार अधिकारी रंजना धिवरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, विविध विद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तीन दिवस सुरू राहणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात विद्यार्थिनींना स्व – संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.