मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवली-कल्याण परिसरात भाजपाकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटातील दोन महत्त्वाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर हा वाद चिघळला आहे.डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजीत थरवळ, तसेच कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
या घडामोडींनंतर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.“रवींद्र चव्हाण आपल्या मनाप्रमाणे वागत असतील, तर आमच्याकडूनही रिअॅक्शन होणारच. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला, तर आम्हालाही उत्तर द्यावे लागेल,” असे शिरसाट म्हणाले.
याचबरोबर त्यांनी महायुतीत फूट पडण्याचा इशारा देत स्पष्ट केले “लोकांना महायुती हवीय. पण फाटाफूट कराल, तर आम्हाला स्वतंत्र लढण्यावाचून पर्याय राहणार नाही.”दरम्यान, डोंबिवलीतील शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनीही चव्हाण यांच्यावर नाराजी व्यक्त केली.“इतक्या मोठ्या जबाबदारीवर असूनही त्यांनी स्वतःचा गड सांभाळू शकला नाही. मग त्यांना प्रदेशाध्यक्ष कशाच्या आधारावर केलं?” असा सवाल शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.तसेच त्यांनी भाजपला जुन्या युतीची आठवण करून दिली “अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती केली होती. त्याची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी चव्हाण यांनी विसरू नये.”डोंबिवली-कल्याण महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही फोडाफोड महायुतीत आणखी तणाव निर्माण करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.