नागपूर : अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागपूर जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २७ लक्ष ५१ हजार रूपयांचा धनादेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी रामगिरी येथे आज दिला. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमांबद्दल मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.पूरग्रस्तांच्या विशेषत: मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्तांच्या मदतीसाठी नागपूर जिल्हा परिषद येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवित शासनाच्या आवाहनानुसार स्वेच्छेने पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला आहे. हा निधी शासनाने वेतनातून केलेल्या कपाती व्यतिरिक्त आहे.
जिल्हा परिषद नागपूरतर्फे सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम ठेवत मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी आर्थिक सहाय्य स्वेच्छेने गोळा केल्यामुळे याला विशेष महत्व आहे. यापुर्वी दिवाळीनिमित्त गरजूंना कपडे व इतर साहित्य देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्हास्तरावर एक अभियान म्हणून राबविण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला आहे.
या उपक्रमामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कमलकिशोर फुटाणे, प्रकल्प संचालक विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंशुजा गराटे, मुख्य वित्त व लेखाधिकारी कुमुदिनी हाडोळे, कपिल कलोडे, डॉ. कैलास घोडके, कल्पना ईखार, डॉ. राजेंद्र गहलोत, डॉ. फुके, निखिल भुयार आदी अधिकारी व विभाग प्रमुखांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा केला आहे.