मुंबई: राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला मिळालेल्या यशावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्च करून मतदारांना पैसे वाटले, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.भाजपच्या विजयावर बोलताना राऊत म्हणाले, “विजयाची हॅट्रिक, मॅट्रिक, सॅट्रिक सांगितली जात आहे. पण हा विजय अभूतपूर्व पैसे वाटपामुळे मिळालेला आहे. मतदारांना पैसे पाण्यासारखे वाहिले गेले.”
ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संकेत
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी आज सायंकाळपर्यंत ठाकरे बंधूंच्या जागावाटपानंतर युतीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंवर टीका
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, “अमित शहा यांनी दिलेल्या शिवसेनेचे पुण्य तुम्हाला मिळत आहे. त्या शिवसेनेचे तुम्ही तीर्थ प्या,” अशा शब्दांत त्यांनी शिंदेंवर हल्लाबोल केला.
सर्वोच्च न्यायालयावर नाराजी
निवडणूक चिन्ह आणि पक्षासंबंधीचा वाद अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राऊत यांनी न्यायालयावरही नाराजी व्यक्त केली. “काही प्रकरणांमध्ये सहा तासांत निर्णय होतो, मात्र 40 आमदारांनी पक्ष बदलल्याचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. यामागे दबाव आहे,” असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी आहे.
फडणवीसांचा प्रतिउत्तर
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला मिळालेल्या यशाला “अभूतपूर्व” असे संबोधत नागपूर जिल्ह्यातील मतदारांचे आभार मानले. “महायुतीने 75 टक्के नगराध्यक्ष निवडून आणले असून महाराष्ट्रात भाजप क्रमांक एकचा पक्ष असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे,” असे फडणवीस म्हणाले.