धाराशिव : धाराशिव नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयानंतर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचलं आहे. मतदारसंघात लावलेल्या बॅनरमधून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचल्याचं दिसून येत आहे. धाराशिव नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आल्यानंतर परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवरती "बाळ नाद करायचा" नाही म्हणत नाव न घेता ओमराजेंना डिवचले आहे.
धाराशिव जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने मोठं यश मिळवत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्षपणे डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
धाराशिव नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आल्यानंतर शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर “बाळा, नाद करायचा नाही” असा मजकूर झळकताना दिसत आहे. नाव न घेता केलेला हा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठीच असल्याचं बोललं जात आहे. हे बॅनर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे.
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “बाळ” या शब्दावरून आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात बॅनरबाजी झाली होती. त्या वादाची आठवण या नव्या बॅनरमुळे पुन्हा ताजी झाली आहे.
दरम्यान, या नगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे गटाचा पराभव झाला आहे. याउलट भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने संघटनात्मक ताकद दाखवत बहुतेक ठिकाणी सत्ता मिळवली आहे.
तुळजापूर नगरपरिषदेत भाजपाचे विनोद गंगणे अध्यक्षपदी निवडून आले असून, येथे भाजपने 23 पैकी 18 जागांवर विजय मिळवला आहे. नळदुर्गमध्ये भाजपाचे बसवराज धरणे अध्यक्ष झाले असून, येथेही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मुरूम नगरपरिषदेत भाजपाचे बापुराव पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व राखत अध्यक्षपद पटकावले. शिवसेना शिंदे गटाने उमरगा, कळंब आणि परंडा या नगरपरिषदांमध्ये सत्ता मिळवली आहे. उमरग्यात किरण गायकवाड अध्यक्ष झाले असून, शिंदे गटाने येथे 12 जागांवर विजय मिळवला आहे. कळंब नगरपरिषदेत तिरंगी लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या सौ. सुनंदा शिवाजी कापसे यांनी 2,254 मतांच्या फरकाने विजय मिळवत नगराध्यक्ष झाल्या. परंड्यातही शिंदे गटाचे जाकीर सौदागर अध्यक्ष झाले आहेत. भूम नगरपरिषदेत मात्र चित्र वेगळे दिसून आले. आलमप्रभू भूम शहर विकास आघाडी आणि जनशक्ती नगर विकास आघाडी या स्थानिक आघाड्यांनी एकत्रितपणे राजकीय पक्षांना मागे टाकत सत्ता मिळवली.
दरम्यान, भूम नगरपरिषदेत मात्र स्थानिक आघाड्यांनी बाजी मारत मोठ्या राजकीय पक्षांना धक्का दिला आहे. आलमप्रभू भूम शहर विकास आघाडी आणि जनशक्ती नगर विकास आघाडी यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे.एकूणच, धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल भाजप आणि शिंदे गटासाठी दिलासादायक ठरले असून, ठाकरे गटासाठी ही निवडणूक मोठा राजकीय धक्का मानली जात आहे. त्यातच राणाजगजितसिंह पाटील यांच्या बॅनरमुळे राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे.