ठाणे : पुण्यानंतर आता ठाण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या जवळिकीचे संकेत मिळू लागले आहेत. “जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत” असे स्पष्ट विधान करत अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
ठाणे शहरात राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा असेल, तर आता सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा, असे सूचक वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केले. “जर ३० तारखेपर्यंत कोणताही प्रस्ताव आला, तर तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. शेवटी आपल्याला कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे” असेही त्यांनी स्पष्ट केले.
कट्टर विरोधकांपासून संभाव्य युतीपर्यंत?
अजित पवार गटाचे नजीब मुल्ला आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आतापर्यंत कट्टर विरोधक मानले जात होते. मुंब्रा–कळवा विधानसभा मतदारसंघात नजीब मुल्ला यांनी महायुतीतून थेट जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र आता त्याच ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
ठाण्यातही राष्ट्रवादी एकत्र येणार?
“जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. ठाण्यात पक्ष वाढवायचा असेल, तर सर्व पर्याय खुले ठेवावे लागतील,” असे म्हणत नजीब मुल्ला यांनी युतीच्या चर्चांना अधिक बळ दिले आहे. त्यामुळे शरद पवार गट देखील अजित पवार गटासोबत पुढील रणनीती ठरवणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडली असली तरी अद्याप जागावाटप जाहीर झालेले नाही. अशा परिस्थितीत ठाण्यातील राजकीय समीकरणे नेमकी कोणत्या दिशेने जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.