रायगड: खोपोली नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून वातावरण भावुक झालं होतं.एकनाथ शिंदे काळोखेंच्या घरी जमिनीवर मांडी घालून बसले. त्यांना पाहताच कुटुंबीय धाय मोकलून रडले. “मी काळोखे कुटुंबीयांच्या मागे ठामपणे उभा आहे. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही,” अशी ठाम भूमिका शिंदेंनी यावेळी मांडली.
आरोपींना फाशीची शिक्षा द्या – कुटुंबीयांची मागणी
काळोखे कुटुंबीयांनी आरोपींवर मोक्का लावावा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी एकनाथ शिंदेंकडे केली. तसेच तपासात दुर्लक्ष केल्याचा आरोप करत पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना तात्काळ निलंबित करण्याचीही मागणी करण्यात आली.
“सूडाचं राजकारण केलं गेलं” – शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले,
“लोकांनी ज्यांना निवडून दिलं, त्यांच्याविरोधात सूडाचं राजकारण करण्यात आलं. अशी घटना पुन्हा घडू नये. माझं या केसवर लक्ष आहे. आरोपींना ठेचून काढू.”
दहा जणांवर गुन्हा, दोन आरोपी अटकेत
26 डिसेंबर रोजी मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्यासह एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 8 वेगवेगळ्या तपास पथकांनी ही कारवाई केली.
शिवसेनेचा सुनील तटकरेंवर आरोप
या हत्या प्रकरणानंतर रायगड जिल्ह्यात राजकारण तापलं आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केले. “तटकरेंच्या सांगण्यावरून रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.दरम्यान, सुनील तटकरेंनी हे आरोप फेटाळून लावत, “घटना निर्दयी आहे, यावर राजकारण होऊ नये. पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा,” अशी प्रतिक्रिया दिली.