मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांच्या एबी (AB) फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचा मुद्दा उपस्थित करत शिंदे गटाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे अधिकृत आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे.
एबी फॉर्मवरील डिजिटल सहीवर आक्षेप
मुंबईच्या मालाड पूर्वेतील उत्तर-पूर्व विभागातील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. प्रभाग क्रमांक 38, 39, 40, 41 आणि 42 मधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या एबी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचे निदर्शनास आले.
शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख वैभव भरडकर यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार एबी फॉर्मवर पक्षप्रमुख किंवा अधिकृत पदाधिकाऱ्याची प्रत्यक्ष (हस्ताक्षरातील) स्वाक्षरी अनिवार्य असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
उमेदवारी बाद होण्याची शक्यता
नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांची उमेदवारी रद्द होऊ शकते. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रार स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
ठाकरे गटात वाढली धाकधूक
या घडामोडीमुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयावर आता या पाच उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.