मुंबई : नवी स्वप्नं, नवी आशा, नव्या आकांक्षा आणि नवे संकल्प उरात बाळगून नविन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज असून हे नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, २०२५ हे वर्ष राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले असून, आता २०२६ मध्ये आपल्याला अधिक वेगाने घोडदौड करायची आहे. सरत्या वर्षातील यशाचा वारसा पुढे नेत, नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे त्यांनी आपल्या शुभसंदेशात म्हटले आहे.
नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्यासाठी कटिबद्ध होऊया असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले आहे.