पुणे : पुणे ही कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. येथे सुरू असलेली लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले. पुण्यात शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडताना त्यांनी नाव न घेता भाजपवर निशाणा साधला.
“आमचा पक्ष विकासावर बोलणारा आहे. त्यामुळे आम्ही कुणावरही टीका करणार नाही. भाजपवर टीका करण्याचं काम अजित पवार आधीच करत आहेत,” असा टोला सामंत यांनी लगावला. मित्रपक्षांना वाटत होतं की शिवसेना उमेदवार उभे करू शकणार नाही, मात्र काही तासांतच 120 उमेदवार उभे केले, असेही त्यांनी सांगितले.
पुण्यात महापौर शिवसेनेच्या मदतीशिवाय होऊ शकणार नाही, असा विश्वास व्यक्त करत सामंत म्हणाले, “इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना पुण्यात 120 जागांवर लढत आहे. 16 तारखेला निकाल लागल्यानंतर महापौर बनवताना शिवसेनेचा विचार करावाच लागेल.”ते पुढे म्हणाले की, “पुणे शहर बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर होतं. विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा.”
भाजप-शिवसेना युतीबाबत बोलताना सामंत म्हणाले, “भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे, ती टिकली पाहिजे असं आमचं मत होतं. पण काहींना गैरसमज होता की आम्ही 40 उमेदवारही उभे करू शकणार नाही. वेळ कमी नसता तर 165 उमेदवार दिले असते.”
“समोरचे टीका करतील, त्यांना विकासातून उत्तर द्या. पुढचे 14 दिवस अहोरात्र काम करा. पुण्यात शिवसेनेची खरी ताकद दाखवून द्या,” असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.शेवटी सामंत म्हणाले, “यंदा पुणे महानगरपालिका पुणेकरांनी आमच्या ताब्यात द्यावी. विकास कसा होतो, हे एकनाथ शिंदे साहेब दाखवून देतील. सगळीकडे शिवसेनेचं वातावरण आहे आणि पुणेकरांचा आशीर्वाद आपल्यालाच मिळणार आहे.”