मुंबई : नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनंतर राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.
निवडणुकीची घोषणा होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत.
या जिल्ह्यांमध्ये होणार निवडणुका
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि कोल्हापूर (एकूण 12 जिल्हे) येथे जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत.
संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन स्वीकारणे : 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026
अर्जांची छाननी : 22 जानेवारी 2026
अर्ज माघारीची अंतिम मुदत : 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत
अंतिम उमेदवार यादी व चिन्हवाटप : 27 जानेवारी दुपारी 3.30 नंतर
मतदान : 5 फेब्रुवारी, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
मतमोजणी : 7 फेब्रुवारी, सकाळी 10 वाजतापासून
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.एकीकडे 5 फेब्रुवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान आणि 7 फेब्रुवारीला निकाल, तर त्यानंतर ग्रामीण महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.