मुंबई : राज्यभरात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. उद्या (१५ जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, सर्वाधिक हायव्होल्टेज मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निकालाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदा मुंबई महापालिकेची मतमोजणी एकाच वेळी न होता टप्प्याटप्प्याने होणार असल्याने निकाल जाहीर होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकांमध्ये शहरातील सर्व २२७ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी करण्यात आली होती. मात्र, यावेळी ही पद्धत बदलण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने मतमोजणी केली जाणार आहे. मुंबई शहरात एकूण २३ मतमोजणी अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, प्रत्येक अधिकाऱ्याकडे साधारण दहा प्रभागांची जबाबदारी असेल. मात्र, एका वेळी केवळ दोन प्रभागांचीच मतमोजणी केली जाणार आहे.
एका वेळी फक्त ४६ प्रभागांची मतमोजणी
या नव्या पद्धतीनुसार संपूर्ण मुंबईत एका वेळी जास्तीत जास्त ४६ प्रभागांचीच मतमोजणी होणार आहे. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार असली तरी सर्व प्रभागांचे कल एकाच वेळी स्पष्ट होणार नाहीत. काही प्रभागांचे निकाल सकाळी जाहीर होतील, तर काही प्रभागांचे निकाल दुपारनंतर किंवा उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.अधिकाऱ्यांच्या मते, टप्प्याटप्प्याने मतमोजणी केल्यास उपलब्ध मनुष्यबळ प्रभावीपणे वापरता येईल आणि मतमोजणीची प्रक्रिया अधिक सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल. मात्र, या निर्णयामुळे निकालासाठीची प्रतीक्षा वाढणार असल्याचे चित्र आहे.
पाच टप्प्यांत मतमोजणी
मुंबईतील २२७ वॉर्डांची मतमोजणी २३ केंद्रांवर होणार असून, एका केंद्रावर जवळपास १० वॉर्डांची मतमोजणी केली जाईल. एका टप्प्यात ४६ वॉर्डांप्रमाणे एकूण पाच टप्प्यांत संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.दरम्यान, राज्यात एकाचवेळी २९ महापालिकांच्या निवडणुका होत असून, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील महापालिकांचा यात समावेश आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल जाहीर केले जाणार आहेत. मात्र, मुंबई महापालिकेच्या बाबतीत निकालासाठी नागरिकांना अधिक प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.