सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्याचे सुप्रसिद्ध निवेदक वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.अक्षता सोहळ्यातील त्यांची अनोखी, ओघवती आणि भावस्पर्शी निवेदनशैली विशेष ओळख ठरली होती. त्यांच्या शब्दांमधून भक्तिभाव, परंपरा आणि श्रद्धेचा संगम अनुभवायला मिळत असे. त्यामुळे अक्षता सोहळा केवळ धार्मिक विधी न राहता भक्तिभावाचा उत्सव ठरत असे.‘व्याख्यान केसरी’ म्हणूनही परिचित असलेल्या शास्त्री यांनी आपल्या प्रभावी वाणीने अनेक वर्षे सोलापूरकरांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत असून, सोलापूरकरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.