मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताची चौकशी आता केंद्रीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) या केंद्रीय संस्थेने या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर देत चौकशी सुरू झाल्याची माहिती दिली आहे.
ब्लॅक बॉक्स ताब्यात, तांत्रिक तपास सुरू
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार, विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे .विमान अपघात आणि घटना नियमांनुसार तपास सुरू आहे. अपघातातील तांत्रिक बाबी, ऑपरेशनल माहिती आणि घटनास्थळावरील पुरावे तपासले जात आहेत .चौकशी पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने केली जाणार आहे.भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांची नेमकी मागणी काय होती?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटले होते की—"अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधून काढावीत आणि भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी तातडीची पावले उचलावीत."
अजित पवारांवर बारामतीत अंत्यसंस्कार
दरम्यान, अजित पवार यांच्यावर बारामती येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात पार्थ पवार आणि जय पवार यांनी अश्रूंच्या साक्षीने अंत्यसंस्कार केले.या वेळी शरद पवार,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे, यांच्यासह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि लाखो नागरिक उपस्थित होते.
राज्यात शोककळा
अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.