पुणे : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथील इकोलूपर संघाने इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय ग्रँड चॅलेंज २०२५–२६ या प्रतिष्ठित स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 'एआय फॉर क्लायमेट चेंज 'या संकल्पनेखाली आणि 'सर्क्युलर इकॉनॉमी अँड वेस्ट मॅनेजमेंट 'या विषयावर देशभरातील एक हजाराहून अधिक संघांनी सहभाग नोंदवला होता.
इकोलूपर संघाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऑडिओ-सक्षम स्मार्ट कचरापेटी विकसित केली असून कचरा टाकताना निर्माण होणाऱ्या ध्वनी संकेतांचे विश्लेषण करून प्लास्टिक, धातू, काच आणि कागद यांचे स्वयंचलित वर्गीकरण करण्याची क्षमता या यंत्रणेत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा वर्गीकरण अधिक प्रभावी करण्यासोबतच मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संघाला ६० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. हा प्रकल्प अर्चना एंजेल, अरविंद जी, निशू कुमारी, ईशिका नारायण आणि आदित्य गौर यांनी साकारला असून त्यांना डॉ. तनुजा सतीश ढोपे, डॉ. धीरज धाने आणि प्रा. रुपाली आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
संघाने या यशासाठी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम,कुलगुरू डॉ. विवेक ए. सावजी, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम तसेच कार्यकारी संचालक सौ. अस्मिता जगताप, प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद आणि उपप्राचार्य डॉ. सचिन चव्हाण व डॉ. सुनीता जाधव यांचे सहकार्य व प्रेरणेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यासंदर्भात बोलताना प्राचार्य डॉ. राजेश प्रसाद यांनी सांगितले की, महाविद्यालयातील नवोन्मेषावर आधारित अध्यापन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देणारी शैक्षणिक प्रक्रिया विद्यार्थ्यांना वास्तव जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी सक्षम करते. माननीय कुलगुरू डॉ. विवेक ए. सावजी यांनीही हे यश विद्यापीठाच्या अनुभवाधारित शिक्षण आणि रूपांतरित संशोधनावर दिलेल्या भराचे प्रतिबिंब असल्याचे सांगितले. व्यवस्थापन, प्राचार्य आणि प्राध्यापकवर्गाने इकोलूपर संघाचे अभिनंदन केले आहे.