पुणे : मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं यश मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही जागा आणि पंचायत समितीच्या सर्व दहा जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या निकालामुळे मावळमध्ये राष्ट्रवादी हा प्रभावी राजकीय घटक ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.
या ऐतिहासिक विजयानंतर आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले, मात्र अजित पवार यांची आठवण काढताना ते भावूक झाले. “अजितदादा असते तर आजचा हा विजय आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात साजरा केला असता. कठीण काळातही मावळच्या जनतेने राष्ट्रवादीवर विश्वास दाखवला,” असं त्यांनी सांगितलं. मावळच्या विकासासाठी अजित पवार यांनी मोठा निधी मंजूर करून अनेक कामांना चालना दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, आटपाडी तालुक्यातील करगणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे विनायक मासाळ विजयी झाले. त्यांची उमेदवारी स्वतः अजित पवार यांनी जाहीर केली होती. विजय मिळाल्यानंतर मासाळ यांनीही अजित पवार यांची उणीव प्रकर्षाने जाणवत असल्याची भावना व्यक्त केली.या निकालामुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक मजबूत झाल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.