उरण : उरण नगर परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून दलीत, आदिवासी गोरगरीब कंत्राटी सफाई कामगार कार्यरत आहेत. या कंत्राटी कामगारांनी कोवीड मध्ये देखील जीवाची बाजी लावून काम केले.या कर्तव्यदक्ष व प्रामाणिक कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत त्या पूर्ण होत नसल्याने या कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.अध्यक्ष ऍड सुरेश ठाकूर,कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगर परिषद मधील कचरा साफ सफाई कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी लाखो रूपये अधिकचे खर्च करून काम दिले जाते.मात्र कमीत कमी कामगार वापरून अधिकाधीक नफा मिळवण्याचे काम अतीशय राजरोसपणे ठेकेदार मे. समिक्षा एंटरप्राईजेस करत आहे. उरण नगर परिषद प्रशासन मात्र या बाबतीत मौन पाळून शांत का ?
हा प्रश्न जनतेच्या मनात येत आहे. उरण शहरात कचर्याचे साम्राज्य असतानाही ठेकेदार कामगारांना कामावर घेत नाही या आडमुठ्या धोरणा विरोधात जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाहीत असा आक्रमक पवित्रा उपोषण कर्त्यांनी घेतला आहे. या बाबतीत प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन कामगार वर्गांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वच स्तरातून होताना दिसून येत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांना याबाबतीत निवेदन देण्यात आले आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
विविध खालील समस्या सोडविण्यासाठी "आमरण उपोषण" जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड, अलिबाग येथे सुरू झाले आहे.
१) ११ कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ रूजू करून घेणे.
२) मागील में. भाग्यदिप वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीने तीन वर्षे नियमानुसार पीएफ भरलेला नाही.तो त्वरित भरण्यात यावा
३) २ वर्षांचा बोनस दिलेला नाही. तो त्वरित मिळावा
४) मृत कंत्राटी सफाई कामगारांच्या वारसांना ईएसआयसी योजनेचा लाभ मिळालेला नाही.तो लाभ त्वरित मिळावा
५) में. समिक्षा एंटरप्राईजेस या नवीन ठेकेदाराने ५ महिन्यांचा पीएफ भरलेला नाही.हा पीएफ त्वरित मिळावे
६) में. समिक्षा एंटरप्राईजेस या कंपनीने कामगारांना ईएसआयसी या योजनेचे कार्ड दिलेले नाही.ते कामगारांना त्वरित मिळावे.