मुंबई : मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी राज्यातील अतिशय प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना निवडले जाते. या योजनेतून मिळणारा प्रशासकीय कार्यानुभव युवकांना त्यांच्या भावी करिअरमध्ये आघाडीवर नेईल, असे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.सातव्या मुख्यमंत्री फेलोशिप योजनेअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शासकीय कार्यालयांमध्ये आंतरवासिता करीत असलेल्या ६० मुख्यमंत्री सहयोगी युवकांशी महाराष्ट्र लोकभवन मुंबई येथे संवाद साधताना डॉ. नारनवरे बोलत होते.
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेमुळे युवकांना जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालयीन विभाग प्रमुख, सचिव, मंत्री व मुख्यमंत्री कार्यालयात काम करण्याची संधी मिळते.मुख्यमंत्री सहयोगी म्हणून निवड झालेल्या युवकांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे, परंतु त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पुढे जाऊन कार्य करावे. सार्वजनिक धोरण क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे आणि त्यात प्रावीण्य प्राप्त करावे. कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्धिमत्ता वाढवावी, असेही नारनवरे यांनी सांगितले.
डॉ. नारनवरे यांनी मुख्यमंत्री सहयोगी युवकांना लोकभवनाच्या वैधानिक, सांसदीय, आदिवासी विकास, शैक्षणिक तसेच राजशिष्टचार विषयक कार्याची माहिती दिली.मुख्यमंत्री फेलोशिप ही निवड झालेल्या युवकांचा अनुभव समृद्ध करणारी योजना असल्याचे या योजनेच्या मुख्य संपर्क अधिकारी प्रिया खान यांनी यावेळी सांगितले. ‘मुख्यमंत्री फेलोज’ना आयआयटी मुंबईच्या ‘पब्लिक पॉलिसी’ विषयाचे प्रमाणपत्र दिले जाते असे त्यांनी सांगितले.यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे व राजशिष्टाचार अधिकारी अर्चना गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री सहयोगी युवकांनी लोकभवनाच्या ऐतिहासिक परिसराला भेट दिली.
Facebook :- https://www.facebook.com/Governor-of-Maharashtra-586490304812054
Twitter :- https://www.twitter.com/maha_governor
Website :- https://rajbhavan-maharashtra.gov.in/
Youtube :- https://www.youtube.com/channel/UCb0rZ0A5rPP0yXeSFkfIICA
Instagram:- Instagram:- https://www.instagram.com/lokbhavanmaharashtra/