मुंबई : विधानसभेत दिवंगत नेतेअजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांत आठवणींना उजाळा दिला. “दुसरी सकाळ महाराष्ट्राला आणि अंत:करणाला चटका देणारी ठरली. बारामती पोरकी झाल्यासारखी वाटली. असे मित्र पुन्हा मिळत नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
ठाकरे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात अनेकदा मर्यादा ओलांडल्या गेल्या. “एखादा माणूस चुकू शकतो, पण त्याचे मूल्यमापन करताना वस्तुस्थिती पाहणे गरजेचे असते. दादांनी प्रत्येक आरोपाला आपल्या कामातून उत्तर दिले. ते कधी खचले नाहीत,” असे ते म्हणाले. कठीण प्रसंगातही त्यांनी स्थैर्य राखले, असेही त्यांनी नमूद केले.
सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. या वेळी ठाकरे काही क्षण भावूक झाल्याचे दिसून आले.महाराष्ट्राने अनेक दमदार नेते गमावल्याची खंत व्यक्त करत ठाकरे म्हणाले की, अपेक्षा ठेवायला लावणारी नेतृत्वे अचानक निघून जाणे हे राज्याचे दुर्दैव आहे. “अशी माणसं वारंवार जन्माला येत नाहीत,” असे ते म्हणाले.
आपल्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीला विचारधारात्मक मतभेद असतानाही पुढे सहकार्याची वेळ आली, याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, अजित दादांनी कधीही तक्रारीचा सूर लावला नाही. आरोपांच्या वादळातही त्यांनी डगमगून न जाता कामाच्या जोरावर विश्वास संपादन केला.
बारामतीतील त्यांच्या विकासकामांचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “दुर्घटनेनंतर मध्यरात्री बारामतीत गेलो तेव्हा शहर पोरके झाल्यासारखे वाटले.” त्यांच्या कामातील शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि प्रशासकीय कामकाजातील अभ्यासू वृत्ती यांचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
लॉकडाऊनच्या काळातील आर्थिक आव्हानांची आठवण करून देताना ठाकरे म्हणाले की, “मंत्रालय बंद होते, पण महाराष्ट्र थांबला नव्हता. त्या कठीण काळातही त्यांनी समतोल साधत काम पुढे नेले.”शेवटी, “मी एक विश्वासू सहकारी आणि दिलदार मित्र गमावला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.