मुंबई : रेल्वे पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मुंबईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. धावण्याच्या मैदानी चाचणीत सहभागी झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील 30 वर्षीय अक्षय मिसाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस मैदानावर 1,600 मीटर धावण्याची चाचणी पार पाडल्यानंतर अक्षय अचानक बेशुद्ध पडले. उपस्थित अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालय येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर पंतनगर पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात कोणताही संशयास्पद प्रकार आढळलेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
माहितीनुसार, अक्षय यांनी यंदा तिसऱ्यांदा रेल्वे पोलीस भरतीसाठी अर्ज केला होता. खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र नियतीने साथ न दिल्याने भरतीच्या मैदानावरच त्यांची जीवनयात्रा संपली.या घटनेमुळे भरती प्रक्रियेत सहभागी इतर उमेदवारांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.