बारामती: रोहित पवार यांनी बारामती पोलिस ठाण्यात बुधवारी जोरदार भूमिका घेत एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. त्यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याचा आरोप करत त्यांनी पोलिस प्रशासनावर सवाल उपस्थित केले. “आमची तक्रार खोटी असेल तर तसे स्पष्ट सांगा; नाहीतर मी खोटा एफआयआर करतोय म्हणून माझ्यावरच कारवाई करा,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
याआधीही मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलिस ठाणे येथे त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती. त्यानंतर आज बारामतीतही तक्रार स्वीकारली जात असली तरी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
चौकशीबाबत प्रश्नचिन्ह
अपघात प्रकरणात संबंधित कंपनीचे मालक, देखभाल करणारे अधिकारी, तसेच पायलट यांना अद्याप चौकशीसाठी का बोलावले गेले नाही, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. डीजीसीएकडून कोणत्या अधिकाऱ्याने परवानगी दिली, याचीही पारदर्शक माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.त्यांच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर एक महिना उलटूनही तपासाची गती समाधानकारक नसून केवळ तांत्रिक तपासावर भर दिला जात आहे. पाच जणांचा मृत्यू झालेल्या या प्रकरणात गुन्हा नोंदवून पुढील चौकशी सीआयडीकडे सोपवावी, अशी त्यांची मागणी आहे.
“दादांना न्याय मिळवण्यासाठी किती वर्षे थांबायचे?”
प्रकरणातील सादर केलेल्या माहितीत काही त्रुटी असतील तर त्यावर अधिकृत उत्तर द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच केंद्र आणि संबंधित कंपनीतील संबंधांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.“सीबीआयकडे हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. दादांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही दहा वर्षे थांबायचे का?” असा सवाल करत त्यांनी तपास प्रक्रियेची गती वाढवण्याची मागणी केली.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे बारामतीतील राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.