मुंबई : भारतीय क्रिकेटविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंह यांचे वडील खानचंद्र सिंह यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते यकृताच्या चौथ्या टप्प्यातील कर्करोगाने त्रस्त होते. प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संघर्षातून उभा राहिलेला प्रवास
रिंकू सिंह आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडत असला, तरी त्याच्या यशामागे वडिलांचा मोठा त्याग आणि परिश्रम होते. अलिगडमध्ये घराघरांत गॅस सिलिंडर पोहोचवण्याचे काम करून खानचंद्र सिंह यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी मुलाच्या क्रिकेटच्या स्वप्नांना नेहमी पाठिंबा दिला. मुलगा मैदानावर षटकार ठोकत असताना वडील मात्र कष्टाची वाट चालत राहिले.रिंकूने यश मिळवल्यानंतर वडिलांना मेहनतीचे काम सोडण्यास सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच त्याने वडिलांना स्पोर्ट्स बाईक भेट दिल्याची माहिती समोर आली होती. बाप-लेकातील घट्ट नात्यामुळे या निधनाचा मोठा मानसिक धक्का रिंकूला बसला आहे.
उपचारादरम्यान प्रकृती खालावली
खानचंद्र सिंह यांच्यावर काही काळापासून रिनल रिप्लेसमेंट थेरपी सुरू होती.
सध्या भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी असून रिंकू संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचे कळताच त्याने तात्पुरते संघातून सुटी घेतली आणि कुटुंबासोबत राहण्यासाठी घरी परतला. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफनेही त्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती.
विश्वचषकातील कामगिरी
यंदाच्या टी-२० विश्वचषकात रिंकूने काही सामन्यांत खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत संघासाठी योगदान दिले. मर्यादित संधी असूनही त्याने पाकिस्तानविरुद्ध झटपट धावा करत प्रभाव पाडला. इतर काही सामन्यांत त्याला मोठी खेळी करता आली नसली, तरी संघातील त्याची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.रिंकू सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, क्रिकेटविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.